पुणे जिल्ह्यातील तळेगावाजवळील इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून मोठी दुर्घटना झाल्याची घटना आज (रविवार, 15 जून) रोजी दुपारी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार पूल कोसळून 20 ते 25 लोक या झालेल्या दुर्घटनेत वाहून गेल्याची तर 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
तर या घटनेची तात्काळ माहिती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संपर्क करून युद्धपातळीवर शोध घेण्याचे आदेश दिले. तर घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 6 जणांना वाचविण्यात यश आले असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेत 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.