अकोला : भाजपा सोबत युती करणे ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. अकोला येथे पक्षाच्या कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी जानकर पुढे म्हणाले की, भाजपाला पराभूत करण्यासाठी भाजप सोडून कोणाशीही युती करण्यासाठी आपण तयार आहे. आता भाजपची काँग्रेस झाली असून इतर पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणायचं आणि पक्ष मोठं करायचा असे भाजपचे धोरण असल्याची टीका जानकर यांनी केली.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जिथे शक्य झालं तिथे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, मनसे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचं ते म्हणाले. ज्या ठिकाणी आघाडी होणार नाहीये, त्या ठिकाणी पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.भाजपला पराभूत करण्यासाठी भविष्यात राजू शेट्टी, बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्ष यांसह रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केले आहे. 2029 मध्ये लोकसभा लढणार असून यापुढे केंद्राच्याच राजकारणात राहणार असून यापुढे केंद्रातच मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, आपला पक्ष डिमांडर नाही तर कमांडर असल्याचं ते म्हणालेय. देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्ते आहेत. तर आपण नेते आहोत. आपल्यामुळे आपली बहीण पंकजा मुंडे कधीही अडचणीत येणार नाही, हा आपला प्रयत्न असल्याचं ते म्हटले. बहिणीने दिल्या घरी सुखी राहावं, अशा शुभेच्छा त्यांनी पंकजा मुंडे यांना दिल्या आहेत. आधी निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आपला राजकीय संघर्ष उद्धव ठाकरेंशी होत होता मात्र आता आपण उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि काँग्रेस एकत्र आल्याचं त्यांनी सांगितले.