टायर तयार करण्यासाठी जे रबर लागतं त्याच्या उत्पादनासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात होते आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागलेत. आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यात ते रबर उत्पादन २०१३-१४ मध्ये फक्त सात टक्क्यांवर होतं, ते आता २२ टक्क्यांच्याही वर गेलंय. त्रिपुराचं उत्पादन ३९ हजार ५०० टनांवरुन दहा वर्षात ९१ हजार ५०० टनांच्याही वर गेलंय. दुसरीकडे आतापर्यंत सर्वाधिक रबर उत्पादन करणाऱ्या राज्यात टॉपला असलेल्या केरळचं उत्पादन मात्र ६.५ लाख टनांवरुन ६.१ लाख टनांवर घसरलंय. आपलं देशांतर्गत नैसर्गिक रबर उत्पादन सध्या साडे आठ लाख टनांवर आहे आणि एकूण गरज ही साडे १४ लाख टनांची आहे. त्यामुळे उर्वरित रबर हे अजूनही आयात करावं लागतंय, ज्यामुळे टायर्सच्या किंमती वाढलेल्या आहेत. ईशान्येतील राज्यांमध्ये उत्पादन वाढीसाठी अजून क्षमता आहे आणि अखिल भारतीय रबर उत्पादन संघटनेकडून हे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
टायरच्या रबर उत्पादनात इशान्येतील राज्यांची मोठी आघाडी
